इंदिरा गांधींनी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून केवळ एक महिना लोटला होता. इंदिरा गांधीचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपल्या हयातीत पूर्व भारतातील कळीचा प्रश्न काही सोडवता आला नव्हता. हा प्रश्न वडिलांनंतर मुलीच्या हाती आला. इंदिरा गांधीना यावेळी पूर्व भारताबद्दल काय तो ठोस निर्णय घेणे भाग होते. हा प्रश्न होता पूर्व भारतामध्ये उठलेल्या बंडखोरीच्या वादळाचा…! पूर्व भारताचा प्रदेश तसा अतिशय दुर्गम ! विविध आदिवासी जाती जमातींची ही भूमी ! भारत स्वतंत्र झाल्यानंतर पूर्व भारतामध्ये स्वत:च्या वेगळ्या प्रदेशासाठी अनेक जमातींनी बंडाचं शस्त्र उगारल. त्यापैकी एक प्रदेश होता मिझोरम ! ऐझॉल या राज्याची राजधानी आहे. १९७२ पर्यंत हा प्रदेश आसामचाचं एक भाग होता. १९६१ मध्ये मिझोरमच्या मूळ मिझो समाजाने त्यांच्या वेगळ्या राज्याची मागणी करण्यासाठी मिझो नॅशनल फ्रंट स्थापन केला. प्रथम शांततेने मागण्या करणाऱ्या या संघटनेने हळूहळू शस्त्रांचा मार्ग स्वीकारला आणि २८ फेब्रुवारी १९६६ मध्ये मिझो नॅशनल आर्मी या संघटनेच्या नावाने त्यांनी भारत सरकारविरुद्ध बंडाचं निशाण फडकावलं. या बंडखोरीचे लोण काहीच अवधीत संपूर्ण पूर्व भारतात वेगाने पसरत गेलं. २ मार्च रोजी मिझो नॅशनल आर्मीने ऐझॉल शहराच्या दिशेने कूच केली. त्यांनी ऐझॉल शहरावर ताबा मिळवला. भारतीय सैन्याने मिझो नॅशनल आर्मी विरोधात कडवी झुंज दिली. पण त्यांचा बिमोड करण्यात ते अयशस्वी ठरले आणि मिझो नॅशनल आर्मीने भारतीय सैन्याला मिझोरम मधून हद्दपार केले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी मिझोरम हे राज्य त्यांच्या ताब्यात असून ते भारतापासून स्वतंत्र आहे अशी घोषणा केली. बंडखोरीच्या या घटनेमुळे संतापलेल्या इंदिरा गांधी यांनी सैन्याला कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला. ५ मार्च १९६६ रोजी इंदिरा गांधी यांच्या परवानगीने भारतीय हवाईदलाने ऐझॉल शहरावर आकाशातून मशीनगनने हल्ला करण्यास सुरुवात केली. परंतु मिझो नॅशनल आर्मी हटत नसल्याचे पाहून इंदिरा गांधी यांच्याशी सल्लामसलत करून भारतीय हवाईदलाने अतिशय कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ मार्च रोजी हवाईदलाने ऐझॉल शहरावर आकाशातून बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे कित्येक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. रिपब्लिक वेंगम हमइचचे वेंग, दावरपुई वेंग आणि चिंगा वेंग हे शहरातील सर्वात मोठे प्रदेश अक्षरश: बेचिराख झाले. स्थानिक घरातून पळून डोंगरात लपून राहिले. मिझो नॅशनल आर्मीचे सदस्य या अनपेक्षित हल्ल्यामुले भूमिगत झाले. अनेकांनी प्रथम ब्रह्मदेश आणि त्यानंतर पूर्व पाकिस्तानामध्ये जाऊन आश्रय घेतला. सुमारे आठवडाभर भारतीय हवाईदलाने बॉम्ब हल्ल्याची कारवाई अविरत सुरु ठेवली.भारतीय इतिहासामध्ये ही गोष्ट प्रथमच घडली की भारतीय हवाई दलाने आपल्याच देशामध्ये आपल्या बांधवांवर बॉम्ब हल्ले करण्याची कारवाई केली. |
|