सायकल चोराला बेदम धुवायचे म्हणून त्यांनी रिंगमध्ये पाउल टाकले आणि पुढे इतिहास घडला ! मोहम्मद अलीची जीवनगाथा ही आधुनिक युगातील अतिशय प्रेरणादायी जीवनगाथांपैकी एक आहे. ते तरुण पिढीचं नेतृत्व करणारे एक अस्सल बॉक्सर आणि कवी होते. म्हणूनच की काय तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ होती. नेल्सन मंडेला प्रमाणे मोहम्मद अली देखील हटवाद आणि वर्णद्वेषाशी लढले. समाजातील या घातक प्रवृत्तींशी लढत असतानाच रिंग मध्ये ते सनी लिस्टो, जॉर्ज फोरमॅन आणि फ्रेझीयर सारख्या महान बॉक्सरशी लढले आणि त्या सर्वाना त्यांनी चीतपट केले हे विशेष! त्यांनी बॉक्सिंगमध्ये ऑलम्पिक गोल्ड मेडल मिळवून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं होतं. बॉक्सिंगमधून निवृत्त झाल्यानंतर मोहम्मद अली यांनी समाजसेवेचा आणि जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करण्याचा मार्ग अवलंबला. १७ जानेवारी १९४२ रोजी अमेरिकेमध्ये जन्मलेल्या मोहम्मद आली यांनी जीवनात संघर्ष करत प्रसिद्धी मिळवली. जगभर त्यांचे नाव झाले. लोकांच्या गळ्यातील ते ताईत बनले. लोकांनी त्यांच्यावर जितकी माया केली तितकीच माया मोहम्मद अलींनी आपल्या चाहत्यांवर देखील केली. या “The People’s Champion“ ने वयाच्या ७४ व्या वर्षी ३ जून २०१६ रोजी अखेरचा श्वास घेतला आणि अख्खे बॉक्सिंग विश्व हळहळले. अश्या या लढाऊ व्यक्तिमत्वाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. १९५४ सालची गोष्ट आहे. १२ वर्षांच्या लहानग्या मोहम्मद अलीची सायकल कोलंबिया ऑडीटोरीयम बाहेरून कोणीतरी लंपास केली. ही सायकल म्हणजे मोहम्मद अलींचा जीव की प्राण होती. मोहम्मद अलीने पोलीसाला गाठले आणि त्याला म्हणाला की जर तुम्हाला चोर सापडला तर त्याला माझ्या हवाली करा. मी त्याला सरळ करतो. जॉय मार्टिन नावाच्या त्या पोलिसाला लहानग्या मोहम्मद अलीचे कौतुक वाटले. हा पोलीस स्वत: बॉक्सिंग ट्रेनर होता. त्याने लहानग्या मोहम्मद अलीला बॉक्सिंग शिकण्याचे आमंत्रण दिले. चोराला मारण्याच्या उद्देशाने बॉक्सिंग शिकण्यासाठी गेलेल्या मोहम्मद अलींनी पुढे काय इतिहास घडवला हे वेगळं सांगायची गरज नाही. हे ऐकून आश्चर्य वाटेल पण मोहम्मद अली दगडांच्या सहाय्याने बॉक्सिंगचा सराव करायचे. म्हणजे आपल्या सहकाऱ्याला ते स्वत:च्या दिशेने दगड फेकायला सांगायचे आणि समोरून येणाऱ्या दगडाला आपल्या हाताने अडवायचे. आजवर जगातील कोणत्याही बॉक्सरने अश्या प्रकारे बॉक्सिंगचा सराव केल्याचे ऐकिवात नाही. २९ ओक्टोंबर १९६० या दिवशी मोहम्मद अलींनी टनी हन्स्केरला हरवून आपली पहिली प्रोफेशनल फाईट जिंकली होती आणि विशेष म्हणजे हा टनी हन्स्केर वेस्ट वर्जिनियाचा पोलीस प्रमुख होता. अश्याप्रकारे मोहम्मद अलींनी एका पोलिस अधिकाऱ्याला बेदम धुवून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहित नाही पण मोहम्मद अलींमध्ये एक कवी, गायक आणि नट लपलेला होता. १९६३ साली मोहमद अलींनी त्यांचा गाजलेला “I AM The Greatest” हा अल्बम रिलीज केला होता आणि त्या पुढील सहा महिन्यातच चॅम्पियन सनी लिस्टोनला हरवत त्यांनी World Heavyweight Title वर आपले नाव कोरले आणि आपण Greatest असल्याचे सिद्ध केले. मोहम्मद अलींना विमानाची फार भीती वाटायची. ही गोष्ट १९६० च्या काळात रोम ऑलम्पिकसाठी युरोपला निघताना त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्या वेळी ते इतके घाबरले होते की विमानात पॅराशूट परिधान करून ते बसले होते. मोहम्मद अलींनी देशासाठी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून आणल्यानंतरही त्यांना स्वत:च्याच देशात वर्णद्वेषाचा सामना करावं लागला. जेव्हा मोहम्मद अली सुवर्णपदक जिंकून परतले तेव्हा केंटुकी मध्ये एक पार्टी आयोजित केली होती. गळ्यात सुवर्णपदक घालून मोहम्मद अली आत शिरले आणि तेथल्या एका वेटरने त्यांना अडवून सांगितेल, आम्ही निग्रोंना सर्व्ह करत नाही मोहम्मद अलींनी देखील जास्त वाद न घालता उत्तर दिले की, ते सर्व ठीक आहे, पण आम्हाला खाऊ नको, आम्ही जातो यावरून लक्षात येते की त्याकाळी अमेरिकेत वर्णद्वेष किती प्रमाणात माजला होता. १९६४ साली आपल्या पहिल्या वर्ल्ड टायटल फाईट मध्ये मोहम्मद अलींना पुन्हा सनी लिस्टोनचा सामना करावा लागला. सनी लिस्टोनने आधीच्या लढतीत फॉर्मर चॅम्पियन फ्ल्योयड पॅटरसन याला हरवले होते. त्यामुळे मोहम्मद अली सनी लिस्टोन समोर टिकणार नाही याची सर्वांना खात्री होती. परंतु अवघ्या २२ वर्षाच्या मोहम्मद अलींनी चॅम्पियन सनी लिस्टोनचा ७-१ असा धुव्वा उडवत वर्ल्ड टायटल स्वत:कडे खेचून घेतले. मोहम्मद अली हे मुळचे आयरिश होते ही गोष्ट देखील सहसा कोणाला ठावूक नाही. १८०० मध्ये त्यांचे पूर्वज आयर्लंड वरून अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. १९७१ मध्ये जोए फ्रेझीयर बरोबर व्हियेतनाम मध्ये फाईट करण्यास मोहम्मद अलींनी नकार दिला म्हणून त्यांच्यावर साडेतीन वर्षांसाठी बॉक्सिंग खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली. पण साडेतीन वर्षाननंतर जेव्हा मोहम्मद अली रिंगमध्ये परतले तेव्हा मात्र ती या शतकातील सर्वात मोठी फाईट ठरली. या फाईटची डिमांड इतकी होती की भल्या भल्या श्रीमंत माणसांना या फाईटची तिकीट मिळाली नाहीत. क्रूरकर्मा सद्दाम हुसेन याने १९९० साली कुवेत मध्ये २००० परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यामध्ये काही अमेरिकन नागरिक देखील होते. मोहम्मद अली यांना ही गोष्ट पटली नाही. ते स्वत:हून सद्दाम हुसेनला भेटायला गेले आणि बंदींना सोडून देण्याची विनंती केली. सद्दाम हुसेन याने मोहम्मद अलींची सर्व विनंती मान्य केली नाही परंतु जगातील सर्वात प्रसिद्ध मुस्लीम व्यक्ती आपल्याला विनंती करतोय हे पाहून सद्दाम हुसेन याने पुढच्या ५० मिनिटांत सर्व १५ अमेरिकन नागरिकांना सोडून दिले. ही गोष्ट मोहम्मद अलींच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट ठरली आणि अमेरिकन नागरिकांच्या मनात त्यांनी कायमचे घर केले. मोहम्मद अली हे व्यक्तिमत्त्व समजणे तसे फारच कठीण! त्यांच्या जीवनात विसंगत प्रसंगांची इतकी सरमिसळ आहे की मोहम्मद अली हे नेमक्या कोणत्या प्रकारातेल होते हे कळतच नाही. बहुधा स्वत:चा हाच दुसऱ्यांना न कळू देण्याचा गुण त्यांनी बॉक्सिंग रिंग मध्ये वापरला आणि त्याच्याच जोरावर आजवरचा सर्वोत्तम बॉक्सर म्हणून नाव कमावले…! आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा.
0 Comments
महेंद्रसिंग धोनी – एक असा अवलिया जो अचानक येतो आणि भारतीयच नाही तर अवघं जागतिक क्रिकेट विश्व हलवून सोडतो. सचिन तेंडूलकर नंतर ज्या कोणा क्रिकेटरने सर्वात जास्त भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं असेल तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. त्याने मैदानात पाऊल टाकताच ‘धोनी धोनी धोनी’ असा कल्लोळ माजवणारे प्रेक्षक आणि संथ चालीने फिल्डकडे जाणारा महेंद्र सिंग धोनी हे दृश्य धोनीच्या प्रत्येक मॅचमध्ये आजही हमखास पाहायला मिळतं, हीच या खेळाडूची कमाई म्हणावी लागेल. अनेकदा चुकीच्या निर्णयांमुळे प्रेक्षकांनी त्याला धारेवरही धरलं. पण त्याही परिस्थितीमध्ये कुल राहून आपला निर्णय सार्थ ठरवणाऱ्या या कॅप्टनने भारतीय क्रिकेटला सोनेरी दिवस दाखवले. वयाच्या पंचविशीत टीसी म्हणून नोकरी करणारा हा तरुण वयाच्या तिशीत मात्र ‘क्रिकेट का अजूबा’ म्हणून नावलौकिक मिळवतो – हा प्रवास खरंच फिल्मीच म्हणायला हवा. पण असा कोणता क्षण होता ज्यामुळे या अवलिया क्रिकेटरच नशीब खुललं, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.प्रत्येक हाडाच्या क्रिकेट रसिकाला ही गोष्ट नक्कीच माहित असेल. पण ज्यांच्या विस्मरणात हि गोष्ट गेली आहे किंवा ज्यांना हा प्रसंग माहिती नाही – त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा तो क्षण चितारण्याचा हा प्रयत्न! २४ सप्टेंबर २००७ मध्ये पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्डकपमधील रंगात आलेला भारत-पाक क्रिकेटचा तो अंतिम सामना. भारताने या सामन्यात पहिली बॅटिंग करत २० ओव्हर मध्ये ५ विकेट गमावून १५७ रन्स बनवले होते. पाकिस्तानला ७.७९ च्या रन रेटने विजयासाठी हवे होते १५८ रन्सभारताच्या प्रभावी बॉलिंग पुढे शरणागती पत्करलेल्या पाकिस्तानची अवस्था झाली होती १४५ रन्स आणि ९ विकेट. केवळ १ ओव्हर बाकी होती. पाकिस्तानला विजयासाठी ६ बॉल्स मध्ये १३ रन्स करायचे होते.स्ट्राईकला होता मिसबाह-उल-हक – आणि बॉलर होता अननुभवी ‘जोगिंदर शर्मा’ – या निर्णायक क्षणी खरतरं धोनीने जोगिंदरच्या हातात बॉल दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कॅप्टन म्हणून खेळणारा नवखा धोनी या निर्णयात सपशेल अपयशी ठरणार याची भीती प्रत्येक क्रिकेटप्रेमी भारतीयाच्या मनाला कुठेतरी खात होती. आणि भारत विजयी होवो यासाठी नकळतच प्रत्येकाचे हात जोडले गेले. जोगिंदरने पवित्रा घेतला आणि तो सरसावला, पण – दुर्दैवाने पहिलाच बॉल वाईड पडला.झालं…सगळ्यांनाच भारताच्या पराजयाची शंका खरी होणार असे वाटू लागले. आता ६ बॉल्समध्ये १२ रन्सजोगिंदर पुन्हा तयार झाला आणि यावेळेस मात्र त्याने मिसबाहला हुकवले आणि वाईड रनची भरपाई केली. आता ५ बॉल्समध्ये १२ रन्स.२ रा बॉल टाकण्यासाठी जोगिंदरने धाव घेतली. यावेळेस मात्र अनुभवी मिसबाह ने घाई न करता बॉल बॅटच्या टप्प्यात येताच सरळ मैदानाच्या बाहेर टोलवला. आणि सर्व पाकिस्तानी प्रेक्षकांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. एका बॉलमध्ये सरळ सहा रन्स गेल्याने भारतीय टीम टेन्शनमध्ये आली. पण धोनीच्या चेहऱ्यावर चिंतेचा लवलेशही दिसत नव्हता. त्याने जोगिंदरला धीर दिला आणि सर्वांनी आपापल्या पोझिशन्स घेतल्या. आता पाकिस्तानला गरज होती ४ बॉल्समध्ये अवघ्या ६ रन्सची३ रा बॉल टाकण्यासाठी जोगिंदर पुन्हा सरसावला. यावेळेसही सिक्स मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिसबाहने चतुराईने चेंडू विकेटकीपरच्या डोक्यावरून टोलवला. पण या वेळेस नशिबाने त्याची साथ दिली नाही. आणि त्याने मारलेला चेंडू थेट फाईन लेगला उभ्या असणाऱ्या श्रीशांतच्या हाती जाऊन विसावला…! आणि सर्वत्र जल्लोष सुरु झाला…! पाकिस्तानच्या पदरात असलेले विजयाच दान जणू आम्हाला पाकिस्तानकडे जायचंच नाही असं म्हणून भारताच्या पदरी पडलं…भारताने हा सामना ३ बॉल्स राखत ५ रन्सने जिंकला. शेवटच्या विकेटसह खेळणाऱ्या मिसबाहला त्याची विजयाला गवसणी घालण्याची घाई नडली आणि १५२ धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. जोगिंदर शर्माला बॉलिंग देण्याच्या धोनीच्या एका निर्णयावर संपूर्ण भारतीय क्रिकेटप्रेमींनी बोट उचललं होत, त्यांनीच ती बोट खाली घेऊन टाळयांच्या गजरात त्याच्या धाडसी निर्णय घेण्याच्या वृत्तीला दाद दिली…! |