जगातील सर्वात क्रूर हुकुमशाह म्हणून आजही वर्षांनी हिटलरचेचं नाव घेतले जाते. त्यांच्या घोर क्रूर कृत्यांनी त्याला क्रूरकर्मा हिटलर अशी पदवी मिळवून दिली आणि जगाच्या काळ्या इतिहासात तो अजरामर झाला. त्याच्या महत्त्वकांक्षी पण गर्विष्ठ स्वभावामुळे त्याने लोकांवर अतोनात अत्याचार केले. हजारो लोकांच्या हत्येचा कलंक त्याच्या माथी लागला. त्याच्या याच पापांची शिक्षा त्याला मरतेवेळी मिळाली असे म्हटले तरी वावगे ठरू नये. जगातील एका कुप्रसिद्ध हुकुमशहावर स्वत:च्या हाताने गोळी झाडून आत्महत्या करण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय ! कोणासमोरही न झुकणाऱ्या हिटलरने त्या दिवशी स्वत:ला मृत्युच्या स्वाधीन केले. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जेव्हा हिटलरला आपली घोडचूक लक्षात आली आणि जर्मनीचा घोर पराभव त्याला दृष्टीक्षेपात दिसू लागला तेव्हा त्याने ३० एप्रिल १९४५ रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली ही बाब संपूर्ण जगाला माहिती आहे. किंबहुना इतिहासचं तसा आहे, तो नाकारता येणार नाही. परंतु Simoni Renee Guerreiro Dias या लेखिकेने Hitler in Brazil – His Life and His Death या आपल्या पुस्तकामध्ये काही असे दावे केले आहेत जे हिटलरचा मृत्यच नाकारतात. तिच्या मते हिटलरने संपूर्ण जगाला चांगलेचं चकवले आहे. असा दावा पहिल्यांदाचं केला जात आहे असेही नाही, कारण यापूर्वी एका नाझी पत्रकाराने हिटलरचा मृत्य ब्राझीलमध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी झाला होता असा दावा करत खळबळ उडवून दिली होतती. सोबत पुरावा म्हणून त्याने हिटलर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं एक छायाचित्र देखील सादर केलं होतं आणि आता त्याच गोष्टीला पुढे नेत Simoni Renee या लेखिकेने त्याचे विधान सत्य होते असे जगजाहीर करून टाकले आहे. पुस्तकातील वर्णनानुसार, दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलरने स्वत:वर गोळी झाडली नव्हती. तर तो तेथून निसटून थेट ब्राझीलला गेला आणि वयाच्या ९५ व्या वर्षी पर्यंत आपल्या गर्लफ्रेंड सोबत सुखाचे आयुष्य जगला. ब्राझीलमध्ये पलायन केल्यावर त्याने अॅडॉल्फ लिपजेग नाव धारण केले. तो ज्या भागात राहायचा त्या भागात देखील याच नावाचा मनुष्य राहत असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तेथील स्थानिकांना त्याच्याबद्दल एवढीच माहिती होती की तो जर्मनीचा रहिवासी आहे. Simoni Renee या लेखिकेने जवळपास २ वर्षे संशोधन करून हिटलरबद्दल हा दावा केला आहे. तिच्या मते हिटलर सर्वांच्या नजरा चुकवीत एका गुप्त मार्गाने अर्जेंटिनामध्ये पोचला. तेथे त्याची ब्राझीलमध्ये राहणाऱ्या कटिंगा नामक महिलेशी ओळख झाली आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या पुस्तकामध्ये Simoni Renee हीने एक छायाचित्र देखील दिले आहे. परंतु ते खूपच धुरकट आहे. या छायाचित्रामधील महिला कटिंगा असून तिच्या सोबत उभा असणारा मनुष्य हिटलर आहे. Simoni Renee यांच्या मते हिटलरच्या खोलीमध्ये मिळालेले शव हे हिटलरचे नव्हते. तो कोणी दुसराच व्यक्ती होता. इथे हिटलरने दुसऱ्या एका व्यक्तीचा बळी देऊन स्वत:च्या आत्महत्येचा बनव रचला. Gerrard Williams या पत्रकार आणि इतिहासकाराच्या म्हणण्यानुसार त्याच्याजवळ FBI ची अशी काही कागदपत्रे आहेत जी सिद्ध करतात की अमेरिका हिटलरच्या मृत्यूनंतरही त्याच्या शोध घेत होती. म्हणजेच त्यांना देखील हिटलरच्या मृत्यूविषयी शंका होती. अजून एक मुख्य आणि दुर्लक्ष न करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे हिटलरच्या जिवंत असलेल्या कुटुंबियांच्या मदतीने एक डीएनए टेस्ट करण्यात आली होती. त्या डीएनए टेस्टमध्ये हिटलरच्या कुटुंबियांचे डीएनए आणि ब्राझीलमध्ये राहत असलेल्या अॅडॉल्फ लिपजेग या व्यक्तीचे डीएनए मॅच झाले आणि हा या दाव्याला बळकटी देणारा सर्वात मोठा पुरावा ठरलायं की ब्राझीलमधील अॅडॉल्फ लिपजेग हाच अॅडॉल्फ हिटलर होता. Simoni Renee यांच्या या दाव्यावर जगभर उलटसुलट चर्चा सुरु आहे. अनेकजण हा दावा पोकळ असल्याचे सांगतात तर अनेक जणांनी तिने दाखवलेल्या पुराव्यामुळे या दाव्यावर विश्वास देखील ठेवला आहे. Simoni Renee हिच्या या खळबळजनक दाव्याला खोडून काढणारा एकच पुरावा होता तो म्हणजे Rochus Misch हा हिटलरचा बॉडीगार्ड ! याच बॉडीगार्डने सांगितले होते की “हिटलरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली आणि तो टेबलावर पडला.” या बॉडीगार्डचा देखील गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वयाच्या ९६ व्या वर्षी मृत्यू झाला. हिटलरच्या मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले आहे. ते लवकरच उकलले जाईल अशी आशा करूया ! रवींद्र कौशिक नाव त्याचं! राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये एका पंजाबी कुटुंबात १९५२ साली त्याचा जन्म झाला. तरुण वयात येईपर्यंत त्याला नाटकाचं भयंकर वेड होतं. अभिनय त्याच्या नसानसात भिनला होता. परंतु एके दिवशी लखनऊ मध्ये प्रयोग सदर करताना RAW या भारताच्या गुप्तहेर संस्थेच्या नजरेत तो आला आणि त्याच्या अवघ्या जीवनालाचं कलाटणी मिळाली. त्याच्या उत्तम अभिनयाचा वापर आपल्या कामासाठी केला जाऊ शकतो याची RAW ला खात्री होती. राष्ट्रीय नाटक स्पर्धेवेळी रवींद्रची एका RAW अधिकाऱ्याशी झालेली ओळख ते रवींद्रने पदवी शिक्षण पूर्ण केल्यापर्यंतच्या काळात तो RAW च्या अधिकचं जवळ गेला. १९७५ मध्ये पदवीधर झाल्यावर रवींद्रने RAW मध्ये प्रवेश केला आणि रवींद्र कौशिक हा राजस्थानमधील लहानश्या गावातील एक तरुण RAW एजंट बनला. येथून त्याचा जो प्रवास सुरु झाला तो थक्क करण्यासारखा आहे. रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद हा भारताचा सर्वात विश्वसनीय आणि सर्वोत्तम स्पाय एजंट होता. सुमारे तीस वर्षे त्याला कामगिरीसाठी RAW ने प्रशिक्षण दिले होते. त्याची परतफेड म्हणून रवींद्रने पाकिस्तान आर्मीमध्ये प्रवेश मिळवला. त्याचा कोणालाच संशय आला नाही, उलट त्याची क्षमता पाहून पाकिस्तान आर्मीने त्याला मेजर हे पद बहाल केले होते. इतकी हुबेहूब नक्कल वठवीत तो कित्येक वर्षे शत्रूच्या गोटात राहून देशाची सेवा करत होता. RAW मध्ये भरती झाल्यावर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तो भूमिगत झाला. त्याच्या प्रशिक्षणा दरम्यान त्याने उर्दू भाषेचा अभ्यास केला. पाकिस्तान मधील लोकांची बोलण्याची लकब, त्यांच्या धार्मिक विधी, पाकिस्तानी आर्मीमधील पद्धती त्याने शिकून घेतल्या. जेव्हा १९७५ साली त्याला पाकिस्तानला पाठवण्यात आले, त्यापूर्वी भारतातील त्याची सर्व ओळख पुसून टाकण्यात आली. भारताचा नागरिक म्हणून त्याचाशी संबंधित जेवढी काही माहिती होती ती पूर्णत: नष्ट केली गेली. त्याला RAW ने एक नवीन ओळख दिली. आता तो झाला होता पाकिस्तानचा नागरिक नबी अहमद शाकीर! पाकिस्तानात गेल्यावर रवींद्रने सर्वप्रथम कराची विद्यापीठामधून कायद्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्याचं पदवीच्या जोरावर त्यांनी पाकिस्तान आर्मीमध्ये प्रवेश केला. तेथे त्याची कामगिरी पाहून त्याला मेजर पदावर बढती मिळाली. याच काळात त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार करून तेथील अमानत नावाच्या एका स्थानिक मुलीशी लग्न देखील केले. कालांतराने त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. १९७९ ते १९८३ या काळात तो अतिशय गुप्तपणे पाकिस्तानच्या हालचाली भारतीय सैन्याला यशस्वीपणे पोहोचवत होता. शत्रूच्या गोटात राहून स्वत:च्या जीवावर खेळत शत्रूची माहिती न चुकता पोचवणारे रवींद्र कौशिक त्यांच्या कामगिरीमुळे भारतीय संरक्षण खात्यामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यांना सर्वजण ब्लॅक टायगर म्हणून ओळखत असतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे नाव त्यांना दिले होते. पण १९८३ मध्ये जणू त्यांच्या या धाडसीपणाला कोणाची तरी नजर लागली. १९८३ साली RAW तर्फे इनायत मसीहा नावाच्या अजून एका अंडरकव्हर एजंटला नबी अहमदला भेटण्यासाठी पाकिस्तानला धाडण्यात आले. पण दुर्दैवाने त्याची ओळख उघड झाली आणि तो पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागला. पाकिस्तानी सैन्याच्या निर्दयतेपुढे त्याने हात टेकले आणि त्याने नबी अहमद उर्फ रवींद्र कौशिकचे सत्य त्यांच्यासमोर उघड केले. रवींद्रला ताब्यात घेऊन जवळपास २ वर्षे त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्याने नाना अत्याचार केले. रवींद्रची दिवसरात्र चौकशी केली, परंतु त्याने देशाबद्दल एक अक्षरही न काढत त्या नरकयातना भोगल्या. तो काहीही सांगत नाही हे पाहून चवताळलेल्या पाकिस्तानने १९८५ साली त्याला मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावली, परंतु नंतर ही शिक्षा बदलून त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यांना अटक झाल्यापासून भारत सरकारने मात्र आपण त्याला ओळखत नसल्याचे सांगत हात झटकले. शिक्षा सुनावल्यानंतर मियांवली, सियालकोट आणि न्यू सेन्ट्रल मुलतान अश्या विविध जेलमध्ये १६ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर २००१ साली टीबी आणि अस्थमाच्या आजरामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतरही भारत सरकारने त्यांचं शव घेण्यासही नकार दिला. भारताच्या नकारानंतर इस्लामीक विधीप्रमाणे पाकिस्तानातचं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही भारताचा हा सर्वोत्तम गुप्तहेर न्यू सेन्ट्रल मुलतान जेलच्या भिंतीआडील कबरीमध्ये शांत निद्रेत पहुडला आहे. कोणत्याही स्वार्थाविना केवळ आपल्या जन्मभूमीच्या सेवेसाठी प्राणांचे बलिदान देणारा हा ब्लॅक टायगर आजही पाकिस्तानात तैनात असणाऱ्या इतर गुप्तहेरांना निडर होऊन आपले कार्य पार पाडण्याची प्रेरणा देतो आहे. १७६१ च्या पानिपत युद्धामधील पराभव हा वैभवशाली मराठी इतिहासाला लागलेला सर्वात मोठा काळा डाग ठरला. या युद्धापासून मराठा इतिहासाला उतरती कळा लागली ती कायमचीच ! रोहिले आणि अफगाणांविरोधात सदाशिवराव भाऊंबरोबर नेटाने लढलेले कित्येक मराठा शूरवीर आणि सैनिक या युद्धात धारातीर्थी पडले, तर मोजता येणार नाही इतके जण जायबंदी झाले. युद्धात सहभागी झालेली अनेक मराठा कुटुंबे लाजिरवाण्या पराभवानंतर आपल्या मायभूमीत परत गेली, तर जवळपास २९८ कुटुंबे तो पराभव सहन करत पानिपता मध्येचं राहिली. त्यांनी तेथेच आपले जीवन नव्याने सुरु केले. आज युद्धाच्या २५४ वर्षांनतर त्यांची लोकसंख्या दहा लाखांच्यावर आहे. मुळचा मराठी मातीतला पण सध्या पानिपतामध्ये स्थायिक असलेला आणि ‘रोड मराठा’ या नावाने प्रसिद्ध असलेला आपला बांधव आज परमुलुखात मान उंचावून जगतो आहे यापेक्षा कौतुकास्पद गोष्ट दुसरी नाही.घोर पराभवाच्या जखमा मनावर आणि शरीरावर घेऊन त्या २९८ कुटुंबांनी काळानुसार पानीपताची भूमी स्वत:ची मानली आणि तेथील संस्कृतीचा प्रत्येक घटक अंगी बाणून घेतला. पानिपत, सोनपत, कर्नाल, कुरुक्षेत्र या भागातील जवळपास २०० गावांमध्ये हा रोड मराठा समाज विखुरलेला आहे. त्यांनी केवळ आपल्या देहबोली आणि पेहरावातचं बदल केला नाही तर आपल्या नावांमध्ये देखील बदल करून घेतले. पवारांचे पानवर झाले, महालेचे महल्ले आणि महालान झाले, जोगदंडाचे जागलन झाले. आज पानिपतामध्ये गेल्यावर रोड मराठा समाज हा एका नजरेत ओळखता येत नाही. बहुतेक जण तर अस्सल जाट असावे असे दिसतात. परंतु बाहेरील रूपातील हा लक्षणीय बदल त्यांच्या अंतरंगातील मराठी संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान मात्र बदलू शकला नाही. अनेकजण स्वत:चा उल्लेख आवर्जून ‘मराठा चौधरी’ असा करतात आणि हा रोड मराठा समाज गर्वाने सांगतो की, आम्ही शूर मराठा सैनिकांचे वंशज आहोत. पानिपतामध्ये फिरताना मराठी नावांच्या दुकानाच्या पाट्या हमखास पाहायला मिळतात. आपली मराठा संस्कृती जपण्यासाठी एका मुलीचा रोड मराठा बाप आपली मुलगी फक्त रोड मराठा समाजाच्या मुला घरीच देतो. हेच कारण आहे की रोड मराठा समाज आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.गंमत अशी की महाराष्ट्रातील मराठ्यांना पानिपतच्या शौर्याचा विसर पडला आहे, पण या रोड मराठ्यांना अजूनही तो इतिहास सर्व तोंडपाठ आहे. त्यांच्या मते, युद्धातील पराभव हा कोणाच्याही हाती नसतो. पेशव्यांनी आणि मराठ्यांनी अखंड भारत जिंकण्याची जी महत्त्वकांक्षा बाळगली तिचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असायलाच हवा. कारण मराठे युद्धातून पळून गेले नाहीत, त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. म्हणजे त्यांच्या पराक्रमापेक्षा त्यांचे शौर्य कित्येक पटीने जास्त आहे. हा रोड मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो. येथे काही तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी सेवा संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत अहमद शाह अब्दाली व रोहील्यांशी लढताना मराठ्यांना आलेल्या वीरमरणाच्या शौर्यगाथेचा प्रसार केला जातो. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर महाभारत घडले म्हणून सरकारने मोठे स्मारक उभारून त्या जागेला वॉर मेमोरीयलचा दर्जा दिला. त्याचप्रकारे पानिपतामध्ये देखील शूर मराठ्यांचे स्मारक उभारून त्या जागेला देखील वॉर मेमोरीयलचा दर्जा द्यावा अशी रोड मराठा समाजाची तीव्र इच्छा आहे आणि यासाठी हरयाणा आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. परमुलुखामधून आलेले म्हणून रोड मराठा समाजाला हरियाणामध्ये कोणीही बोल लावत नाही. हरयाणाच्या राजकारणात देखील रोड मराठा समजाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काही मतदारसंघ असे आहेत जेथे वर्षानुवर्षे केवळ रोड मराठा समाजाचा प्रतिनिधीचं निवडून येतो. हरयाणातील प्रत्येक स्तरावर त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. कधी पानिपताला भेट दिलीत तर आपल्या या बांधवांची भेट घ्यायला बिलकुल विसरू नका. हिंदूकुश. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर हिंदूकुश आडवा तिडवा पसरलाय. ऊंचच उंच ढगात गेलेला हा महाकाय पर्वत! हिंदूकुश हा ‘हिंद कोह’चा अपभ्रंश आहे. हिंद म्हणजे सिंधू नदी आणि कोह म्हणजे पर्वत. सिंधू नदीलगतचा पर्वत-हिंदूकुश! जुन्या पारशी भाषेत हिंदूकुशचा अर्थ “हिंदूंच्या मरणाची जागा” असा होतो म्हणतात. हिमालय नेहमी भारताला चिनी-मंगोल आक्रमकांपासून वाचवत आला. एखाद्या ढालीसारखा. मात्र हिंदुकुश कधीच ढाल बनू शकला नाही. ह्या पर्वत रंगांतली एक जागा भारतासाठी श्राप ठरली. खूप मोठा श्राप! खरं तर पूर्व आशियाला मध्य आशिया आणि आखाती प्रदेशांशी, युरोपशी जोडणारा हा रस्ता होता. प्रचंड मोठा व्यापार ह्या मार्गाने चालत असे. हा शापित मार्ग म्हणजे – खैबर खिंड! पाकिस्तान-अफगाण सीमेजवळ तोरखाम जवळचा हिंदूकुशच्या अजस्त्र रांगांतून जाणारा हा चिंचोळा मार्ग… महमूद गझनवी पासून अहमद शाह अब्दालीपर्यंत सगळे परकीय आक्रमक ह्याच रस्त्याने भारताचे लचके तोडून गेलेत. खैबर खिंड नसती तर आज चित्र काहीसं वेगळं नक्कीच असतं. सन 1398च्या हिवाळ्यात ही अपशकुनी जागा पुन्हा एकदा गजबजून गेली. आणखी एक लाखोंची एक क्रूर, धर्मवेडी रानटी फौज खैबर खिंड ओलांडत होती. ह्यावेळी दिल्लीची दौलत पाहून तैमूरलंग दिल्लीचा सत्यानाश करायला येत होता. मोहम्मद तुघलक मरून पाच दशके होत आली होती. दिल्लीच्या तख्तावर ह्यावेळी नसिरुद्दीन तुघलक विराजमान होता. खैबर खिंडीतुन हिंदूकुश पार केल्यावर 24 सप्टेंबर 1398 रोजी तैमूरच्या फौजांनी अटकेपाशी सिंधू ओलांडली. 30 सप्टेंबरला हे वादळ तुलांबा शहरात पोचलं. शहरातल्या सगळ्या रहिवाश्यांची कत्तल करुन संपत्ती लुटायला बरलास फौजांना फार वेळ लागलाच नाही. पाठोपाठ हीच अवस्था मुलतानची झाली. तुघलकाला कसलीच चिंता फिकीर नव्हती. तैमूरला दिल्लीपाशी पोचता पोचता जाटांचा प्रखर विरोध सोसावा लागला पण संख्येने निम्म्याहून कमी असणारे जाट लाखोंच्या त्या क्रूर बरलास फौजांसमोर टिकाव धरू शकले नाहीत. जाटांची खानदानेच्या खानदाने छाटली गेली. स्त्रियांवर बलात्कार झाले. तुघलकाने जाटांची कसलीही मदत केली नाही. दिल्लीला पोहोचेपर्यंत तैमूरने रस्त्यात असलेल्या प्रत्येक गावाची धूळधाण उडवली. असंख्य माणसे कापली, स्त्रिया कैद केल्या. नसिरुद्दीन तुघलक मात्र नाकर्तेपणाचा कळस रचत दिल्लीत सिंहासनावर ऐश करत बसला होता. तुलांबा, मुलतान ही शहरे उध्वस्त झाली. जहाँपनाह आणि सिरी ही गावे नेस्तनाबूत करून त्यातला प्रत्येक माणूस कापून काढण्यात आला. मेरठला मात्र तैमूरला खच्चून मार बसला. मेरठच्या गुर्जर राजा जोगराज सिंहाला नसिरुद्दीन तुघलकापेक्षा जास्त आपल्या प्रजेची चिंता होती. त्याने आधीच पूर्वतयारी केली. तैमूर मेरठला पोचला तसा संख्येने निम्म्या असणाऱ्या राजपूत, जाट आणि गुर्जर फौजा जीव खाऊन बरलास फौजांवर तुटून पडल्या. तुंबळ हाणामारी झाली. तैमूरच्या सैन्याने तुफान मार खाल्ला. आपण दिल्लीत काबीज करायला आलो आहोत, मेरठसारख्या लहान शहरांवर वेळ, पैसे आणि जीव खर्च नकोत करायला म्हणून तैमूरने मेरठचा नाद सोडला आणि तो रस्ता बदलून दिल्लीकडे निघाला. दिलेर जोगराज सिंहाने मेरठ वाचवले. अखेर डिसेंबर 1398मध्ये तैमूरने दिल्ली गाठली. दिल्ली येईपर्यंत तैमूरने एक लाख भारतीय कैद केले होते. आपली फौज तैमूरपेक्षा जास्त आहे, प्रदेश आपला आहे शिवाय आपल्याकडे लढाऊ हत्ती आहेत म्हणून महामूर्ख नसिरुद्दीन गाफील होता. हे ही खरंच. तातारी-बरलास फौजांना हत्ती फारसे माहित नव्हते. हे लोक हत्तीला वचकून असत. ह्यावर तैमूरने एक जबरदस्त उपाय योजला. दिल्लीजवळ पोचून सर्वात आधी त्याने कैद केलेले सर्व एक लाख कैदी कापून काढले. एक लाख माणूस एका दिवसात कापला गेला. हे क्रौर्य पाहून तुघलकी फौजांचे अर्धे अवसान गळाले. लढाऊ हत्तींवर भरोसा ठेवून गर्भगळीत झालेली तुघलक सेना रणात उतरली. 17 डिसेंबर 1398 रोजी मध्यआशियायी बरलास फौज तैमूरसारख्या अद्वितीय सेनापतीच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय उपखंडातली तुघलकी सेना हत्तीच्या भरवशावर एकमेकांना भिडल्या. सोंडेवर विषारी खिळे लावलेले शेकडो हत्ती बरलास फौजेवर चालून गेले. हत्ती हा प्राणी खूप लवकर भांबावून जातो ही माहिती तैमूरने काढून ठेवली होती. तैमूरने सोबतच्या शेकडो उंट आणि रेड्यांच्या पाठीवर मोठमोठे गवताचे भारे बांधले आणि पेटवले. असे हे उंट आणि रेडे भाल्याच्या टोचण्या देऊन हत्तींकडे पिटाळण्यात आले. शेकडो प्राणी पाठीवर आग घेऊन भयाण किंचाळत अंगावर येतायत हे पाहून तुघलकाचे हत्ती भांबावले, पिसाटले आणि मागे फिरून त्यांनी स्वतःच्याच सैन्याला तुडवायला सुरुवात केली…! असंख्य तुघलक सैनिक स्वतःच्याच हत्तींखाली चिरडून मेले. मौका साधून तैमूरची बरलास-तातार फौजेने तुघलकाची फौज उभी फाडून काढली. अटळ पराभव आणि तैमूरचे क्रौर्य पाहिलेला नसिरुद्दीन तुघलक काही माणसे आणि परिवार घेऊन राणांगणातून पळून गेला!! व्हायचं ते झालं…दिल्ली सताड उघडी पडली. धन-दौलत-संस्कृती-सोनं, रत्ने, धान्याने आणि समृद्धतेने ओसंडून वाहणारी दिल्ली तैमूरच्या निर्दयी पंजात आली. दिल्लीत घुसून तैमूरने तेच केलं जे तो करायला आला होता. तिकडे लांब समरकंदमध्ये त्याला दिल्लीच्या संपत्तीची खुशबू जाणवली होती. शिवाय हिंदुस्तान हा काफिर प्रदेश. दिल्लीचे तुघलक मुसलमान असले तरी ते ह्या काफ़िराना जिवंत कसे सोडतात? धर्मांतर का करून घेत नाहीत? कापून का टाकत नाहीत? लवकरात लवकर हिंदुस्तानात जाऊन तुघलकासारख्या नाकर्त्या सुलतानाला हटवून तिथे एक मजबूत आणि खरी खुरी रियासात कायम व्हायला हवी, हिंदूस्तानातले काफिर एकतर अल्लाहला शरण आले पाहिजेत किंवा खतम झाले पाहिजेत हा उद्देश्य ठेवून तैमूरने दिल्लीवर स्वारी केली होती! 15 दिवस ती रानटी तातारी फौज दिल्लीच्या रस्त्यावर क्रौर्याचा आविष्कार करत नंगा नाच करत राहिली! हजारो माणसे मारली गेली. प्रत्येक स्त्री एकतर मारली तरी गेली नाहीतर तिच्यावर बलात्कार, तो ही अनेकवेळा झाला. लहान मुले, वृद्ध देखील सोडण्यात आले नाहीत. प्रत्येक घर लुटून काढण्यात आले. तैमूरला न मानणाऱ्या, क्रौर्य नं पाहवणाऱ्या खुद्दार मुस्लिम सरदार आणि सैनिकांना देखील मुस्लिम असून सोलून काढण्यात आले. दिल्लीच्या रस्त्यांवर मारल्या गेलेल्या लोकांच्या मुंडक्यांची जागोजागी आरास करण्यात आली. दिल्लीवर इतका क्रूर हल्ला ह्याआधी कधीही झाला नव्हता, ना पुढे कधी झाला. अंदाजे दोन ते तीन लाख माणूस मेला. तैमूरचं समाधान होऊस्तोर दिल्ली लुटून चाटून पुसून काढण्यात आली. ही कत्तल इतकी भयंकर होती की कित्येक दिवस दिल्लीत कुजत पडलेल्या लाखो प्रेतांमुळे आजूबाजूच्या लहान वस्त्यांत रोगराई पसरली. दिल्लीत क्वचित माणूस रस्त्यांवर बाहेर जायला धजावे. 1399च्या सुरुवातीला खिजर खानाला सत्ता देऊन तैमूरने दिल्ली सोडली! जाताना तो हजारो गुलाम, सोनं-हिरे-मोती-जवाहिर लादलेले शेकडो हत्ती घेऊन गेला. तैमूरलंगचा आयुष्यातला हा सर्वात मोठा विजय होता! आणि भारताला झालेली सर्वात क्रूर जखम. अय्याश आणि मूर्ख नसिरुद्दीन तुघलकाच्या नाकर्तेपणाची किंमत हिंदूस्तानाला दिल्लीचा गळा चिरून चुकवावी लागली! तैमूरचं अस्तित्व भारतात ह्या हल्ल्यापुरतं नव्हतं! तैमूर नंतर त्याचंच रक्त पुन्हा दिल्लीवर चाल करून आलं आणि ह्या हल्ल्यानंतर 127 वर्षांनी तीमुरच्या खानदानाने दिल्लीवर भारतीय इतिहासातली सर्वात प्रसिद्ध मजबूत सत्ता प्रस्थापित केली. तैमूरच्या सख्ख्या नातवाचा पणतू म्हणजेच आपल्याला माहित असणारा झहिरुद्दीन मोहम्मद बाबर! पहिला मुघल सुलतान. तैमूरच्या मिरान शाह ह्या मुलाची पाचवी पिढी! गम्मत म्हणजे तैमूरने ज्याला सत्ता दिली त्या खिजर खानाच्या वंशजांनी हि सत्ता बहलोल लोधीला स्वेच्छेने सोपवली आणि बहलोल लोधीचा नातू इब्राहिम लोधीला पुन्हा तैमूरच्या वंशजाकडून पहिल्या पानीपत युद्धात पराभव स्वीकारावा लागला! अमीर तैमूर स्वतःला “इस्लामची तलवार” म्हणवून घेत असला तरी त्याने पर्शियामध्ये मुसलमानांची अशीच कत्तल घडवून आणली. तुर्कीचा महापराक्रमी सुलतान बय्यझीद यल्दरम ज्याने स्पेनपर्यंत मजल मारून युरोपीय ख्रिश्चनांना जेरीला आणलं होतं त्याचाही तैमूरने सत्यानाश केला! अमीर तैमूरच्या क्रौर्याबद्दल, त्याच्या चाणाक्ष सैन्यनीतीबद्दल आणि इतर काही गोष्टींबद्दल थोडी अजून माहिती पुढच्या लेखात. AuthorMarathi Pizza दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे तो मेंढपाळ माळरानावर मेंढ्या चरायला घेऊन आला होता. मेंढ्या चरतायत तोवर मजेने इकडे तिकडे पाहात असताना एकदम त्याला कसलीतरी हालचाल जाणवली. पाहिलं तर झुडुपाआड एक पोरगा हळूच त्याची मेंढी चोरून न्यायला पाहत होता. मेंढपाळाचं डोस्कं सणकलं! ह्यापूर्वीही त्याच्या चार दोन मेंढ्या कोणीतरी पाळवल्या होत्या. लांडग्याने धरून नेल्या असाव्यात असा समज करून घेतलेल्या मेंढपाळाला आज मात्र चोर दिसला! संतापाने तिरिमिरीत त्याने खांद्यावरचं धनुष्य काढून पोरावर निशाणा धरला! पोराला चाहूल लागली तसा तो पळायला लागला पण मेंढपाळाने बाण सोडलाच! बाण येऊन पोराच्या मांडी आणि कंबरेच्या सांध्यावर बसला…लंगडत लंगडत पोरगा पळून गेला. === बाराव्या शतकात चंगेज खानने मध्य आशियातल्या राजवटींची पळता भुई थोडी केली. चंगेजच्या पश्चात त्याच्या मुलांनी आणि नातवांनी अजूनच गोंधळ घातला. मध्य आशिया जवळपास सगळाच बळकावला. मंगोल धर्मवेडे नव्हते. त्यांनी आपला धर्म किंवा संस्कृती कुठे कोणावर लादली नाही. ते जिथे जातील तिथल्या संस्कृतीत विरघळत गेले. मध्य आशियात तेंव्हा इस्लाम जबरदस्त जोमात होता त्यामुळे तिथे तळ ठोकून असणाऱ्या मंगोलानी इस्लाम जवळ केला. तिथल्या स्त्रियांशी लग्ने वगैरे प्रकार रुळत गेले. चंगेजचा मूळ ‘बोर्जीगीन’ वंश आणि तुर्की स्त्रिया ह्यांच्यातून एका नवा वंश तयार झाला. त्याला म्हणत “बरलास”. बरलास अर्धे मंगोल असले तरी धर्माने मुस्लिम होते आणि तुर्की भाषा बोलायचे. चंगेज खानाने मोहम्मद अलाद्दीन शाहची तुर्की-उझबेगिस्तान-कजाखस्तानमधली ख्वारेझमी राजवट धुळीत गाडल्यावर तिथे चगताई ह्या चंगेजच्या मुलाने सूत्रे सांभाळली होती. पुढे चगताईच्या वंशजांनी तुर्की इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्या भागात बेमालूम मिसळून गेले. बरलास वंश उदयाला आला. बरलास वंशाचा एक ‘तारकाई” म्हणून बऱ्यापैकी मोठा माणूस होता. समरकंदच्या दक्षिणेला असणाऱ्या केश नावाच्या गावात त्याचा मान होता. एकदा एका दुसऱ्या मंगोल टोळीने केशवर हल्ला केला. त्यात बरेच लोक कैद करून ते समरकंदला घेऊन गेले. त्यात ताराकाईची बायको आणि मुले देखील होती. त्याचा मुलगा कसाबसा कैदेतून निसटला आणि त्याने स्वतःची एक लहानशी टोळी तयार केली. हा पोरगा जंगलात, माळरानावर दबा धरून बसे आणि येणाऱ्या जाणाऱ्या वा टसरूना लुबाडत असे. एकदा असाच हा पोरगा एका मेंढपाळाची मेंढी चोरायला गेला आणि तैमूरचा तैमूर-ए-लंग झाला ! तैमूरचा जन्म 9 एप्रिल 1434ला केश जवळ झाला. तैमूरचा खरा तुर्की उच्चार ‘देमीर’ असा होतो. काळाच्या ओघात देमिरचा तीमुर आणि तीमुरचा तैमूर झाला. एक पाय लंगडा झाला म्हणून तैमूरलंग. पाश्चात्य लोक त्याकाळी तैमूरलंगला टॅमर म्हणायचे. लंगडा झाला म्हणून टॅमर-द लेम. आज अपभ्रंश होऊन युरोप-अमेरिकेत तैमूरलंग हा “टॅमरलेन” ह्या नावाने ओळखला जातो. तैमूरचा शब्दशः अर्थ लोखंड/पोलाद असा होतो. आणि हे नाव मूळ ‘तीमुजीन’ ह्या मंगोल नावावर आधारलेलं आहे. तीमुजीन म्हणजे सुद्धा लोखंड. आणि तीमुजीन कोणाचं नाव होतं? “चंगेज खान”चं! मध्य आशियात पर्शिया-तुर्कमेनिस्तान-उझबेगिस्तान भागाला अरब मुस्लिम ‘मावार अन् नहर’ म्हणत. म्हणजे अमू दरीया (तुर्कमणिस्तानातील नदी) च्या पलीकडचा प्रदेश. आज ह्या भागाला transoxiana म्हणतात. समरकंद आणि केश ह्या प्रदेशात येतात. तैमूर लहान असताना ह्या भागावर मंगोलांची सत्ता होती. तैमूर 10 वर्षांचा असताना तिथे बंड पुकारलं गेलं आणि एक काजगन नावाचा ‘अमीर’ सत्तेत आला. अमीर म्हणजे योद्धा…जेता. तैमूर विशीच्या आसपास आल्यानंतर काजगनचा खून झाला आणि मंगोल पुन्हा सत्तेत परतले. तोपर्यंत तैमूरने टोळी बनवून बऱ्यापैकी नाव कमावलं होतं. वेळेची नजाकत साधून तैमूर मंगोलाना शरण गेला आणि त्यांचा मदतनीस म्हणून काम पाहू लागला आणि tansoxiana प्रदेशाचा शासक इलियास खोजाचा मंत्री बनला. पुढे तैमूरने बल्ख शहरातल्या हुसेनसोबत दोस्ती केली. हा हुसेन देखील सैन्य बाळगून असणारा मोठा योद्धा होता. अमीर काजगनचा नातू असणाऱ्या हुसेनसोबत हातमिळवणी करून तैमूरने इलियास खोजाविरुद्ध युद्ध पुकारलं. इलियास खोजा सुरुवतीची लढाई हरून प्रदेश सोडून पळाला असला तरी त्याने पुन्हा हल्ले करून तैमूर आणि हुसेनला पळवून लावलं. खोजाने पुन्हा समारकंदचा ताबा घेतला. तैमूर खोरासानला तर हुसेन बल्खला परतला. समरकंदमध्ये जवळपास लोक मुस्लिम होते. त्यांनी इलियास खोजा विरुद्ध बंड पुकारले. त्यात सरबेदर नावाच्या बंडखोरांनी इलियास खोजाला पळवून समरकंदमध्ये इस्लामिक राजवट निर्माण केली. तैमूरने सुरुवातीला सरबेदर लोकांशी मैत्री केली आणि पुढे ताकद वाढल्यानंतर हुसेनसोबत मिळून मारून समरकंद ताब्यात घेतलं. तैमूर समरकंदचा तर हुसेन बल्ख आणि इतर प्रदेशाचा ‘अमीर’ बनला. हुसेनच्या बहिणीशी त्याने लग्न केलं. तैमूर आणि हुसेनच्या स्वभावात खूप फरक होता. तैमूर लोकांकडून फारसा कर वसूल करत नसे. तो व्यापाऱ्यांना संरक्षण देई. गरीब लोकांची स्वतःच्या पैशातून मदत करत असे. माणसे जोडत असे. ह्यामागे त्याची दूरदृष्टी होती. आपल्याला जर विदेश जिंकायचा असेल तर आधी देशात मजबूत पाठिंबा हवा हा डोळसपणा होता. हुसेन अगदी विरुद्ध होता. Transoxiana प्रांतात आता तैमूरचा बोलबाला व्हायला लागला. लोक त्याला मानायला लागले. त्याचा दबदबा आणि रुतबा दिवसेंदिवस वाढू लागला. हे हुसेनला सहन होईना! दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. सुरुवातीचा बेबनाव आता तीव्र स्वरूप घ्यायला लागला. तैमूरच्या बायकोच्या मृत्यूनंतर दोघा मित्रातली कडीच तुटली आणि दोघेही सैन्यासकट एकमेकांसमोर उभे ठाकले.
प्रांतातले अनेक सरदार आणि मोठे लोक तैमूरच्या बाजूने होते. एकेकाळी तैमूरसारखे 50 सरदार पगारी ठेवणाऱ्या हुसेनचा सहज पराभव झाला! किकरसाव ह्या तैमूरच्या सरदाराने हुसेनला बेड्यात बांधून तैमूरसमोर हजार केलं. किकरसावचा भाऊ हुसेनकडून मारला गेला होता त्यामुळे त्याचा हुसेनवर प्रचंड राग होता. बेडीत जखडलेल्या हुसेनला पाहून तैमूर विरघळला! हुसेनने कठीणकाळी केलेली मदत आठवून आणि मित्र म्हणून तैमूरने त्याला माफ केले आणि मक्केला निघून जाण्यास सांगितले. पण मक्केच्या प्रवासाला निघालेल्या हुसेनला किकरसावने रस्त्यात गाठून मारून टाकले! 1470, वयाच्या चौतीसाव्या वर्षी तैमूर ‘अमीर तैमूर’ म्हणवला जाऊ लागला. चगताई राजवट असलेल्या ‘मावार अन् नहर’चा पेशवा असणाऱ्या तैमूरने पुढे चगताई राजवट उधळून तिमूरी राजवट कायम केली! स्वतःला चंगेज खानाचा वंशज आणि इस्लामची तलवार म्हणवणाऱ्या, चंगेज खान नंतर आशिया खंडातले सर्वात मोठे साम्राज्य बनवणाऱ्या, अनेक महाक्रूर कर्म करून बदनाम झालेल्या अमीर तैमूरलंग बद्दल अजून पुढची माहिती पुढील भागात! बऱ्याच लोकांना निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाबद्दल जास्ती माहितीच नाही, फार कमी लोकांना त्याच्या अविष्काराबद्दल माहिती आहे. जे कोणी त्याबद्दल बोलतात, लिहतात ते निकोलाचा उल्लेख एक वेडा, सनकी शास्त्रज्ञ म्हणून करतात पण ते हेही मान्य करतात की आजच्या प्रगत विज्ञानामध्ये त्याचाही मोठा वाटा आहे. तो एक खरोखरच महान असा शास्त्रज्ञ होता, पण त्यांचे कार्य आणि प्रयोग यांचे योग्य श्रेय त्याला मिळाले नाही. अर्थात त्याला त्याचा अव्यवहारी स्वभाव, प्रसिद्धी पासून दूर पळ काढणे, एकाकी जीवन जगणे हे कारणीभूत आहे. आठ भाषा अवगत असलेला , २६ देशात जवळपास ३०० च्या वर पेटंट आणि असे कित्येक अविष्कार ज्यांचे पेटंट घेतलेले नाही, अश्या ह्या शास्त्रज्ञाविषयी, त्याच्या कामाविषयी, वेगवेगळ्या संशोधनाविषयी आणि त्याच्या जीवनाविषयी थोडक्यात जाणून घेऊया ! निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाचा जन्म मिलुटीन टेस्ला आणि ड्यूका टेस्ला ह्या सर्बियन (सर्बियन लोक हे दक्षिण स्लाव जमाती मध्ये मोडतात , हि जमात बाल्कन(दक्षिण-पूर्वी यूरोप) प्रदेशमध्ये आढळते) माता पित्याच्या घरी १० जुलै १८५६ मध्ये ऑस्ट्रियन (सध्याचं क्रोएशिया ) मध्ये झाला होता. पाच अपत्यांपैकी निकोला हे चौथे अपत्य ! लहानपणापासूनच हुशार असलेल्या निकोलाचे प्रायमरी शिक्षण १८६२ मध्ये पूर्ण केलं. अद्वितीय बुद्भिमत्ता असलेल्या निकोलाने सन १८७३ मध्ये चार वर्षाचे शिक्षण ३ वर्षांतच संपवले होते. पुढे १८७५ ला पॉलीटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला अति हुशारीपणामुळे एका शिक्षकामध्ये आणि टेस्लामध्ये मतभेद झाले आणि त्या वर्षी ते नापास झाले, त्यातच त्यांना जुगार खेळायची सवय लागली. महिन्याला मिळणारा भत्ता आणि ट्युशन फी त्यांनी जुगारात उडवली, अभ्यास झाला नाही आणि ते फायनल परीक्षेत नापास झाले. त्यामुळे त्यांचे युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन अपूर्ण राहिले. पुढे ते १८८१ मध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या बुडापेस्टमधील एका बुडापेस्ट टेलिफोन एक्स्चेंज कंपनीत मुख्य विद्युत अभियंता म्हणून नोकरीला लागले. इथे काम करत असताना केंद्रीय संचार उपकरणांत नवीन शोध लावून उपकरणे सुधारित केली आणि नवीन स्वरूपातला टेलिफोन एम्प्लीफायर बनवले पण त्याचे त्यांनी कधीच पेटंट घेतले नाही. पुढे ते १८८२ मध्ये थॉमस अल्वा एडिसन ह्यांच्या फ्रांस मधील कॉंटिनेंटल एडिसन कंपनीत विद्युत उपकरणे डिझाइन करणे आणि improve करण्याचे काम ते करू लागले . पुढे १८८४ साली तेथून त्यांची बदली न्यूयॉर्क (अमेरिका) मध्ये झाली. या दरम्यान त्यांनी काही वेगळ्या प्रकारचे डायनमो विकिसत केले. तेव्हा त्यांना थॉमस अल्वा एडीसन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांनी टेस्लाला त्यांचा डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator ) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला होता. एडिसन यांनी टेस्ला यांना सांगितले की जर ते या कामात यशस्वी झाले तर त्यांना ५०,००० डॉलर बक्षीस म्हणून मिळतील. टेस्ला यांनी एडिसनला हवे तसे बदल करून दाखवले, परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. त्यांनी टेस्ला यांची चेष्टा केली आणि पगारवाढ देखील दिली नाही तेव्हा रागाने टेस्ला यांनी एडिसनची कंपनी सोडली. एडिसन यांची कंपनी सोडल्यानंतर १८८६ मध्ये त्यांनी दोन Investors सोबत आपली स्वतःची Tesla Electric Light and Manufacturing नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये त्यांनी डायनेमो इलेक्ट्रिक मशीन कम्युटेटर तयार केला. अमेरिकेतील हे त्यांचे पहिले पेटंट होते. पुढे त्या Investors सोबतही त्यांचे काही पटले नाही. त्यांनी टेस्लाला कंपनीतून बाहेर काढले. पुढची काही दिवस अगदीच हलाखीची गेली. १८८७ च्या काळात परत नवीन Investors सोबत कंपनी स्थापना केली. इथं ते मोटर आणि जनरेटर वर काम करू लागले होता. त्याच काळात त्यानी Alternative Current (AC ) वर चालणारी Induction Motor बनवली होती. हा तोच काळ होता जिथं एडिसन चा DC Current आणि टेस्ला चा AC Current ह्यावर मोठं व्यावसाईक युद्ध सुरु झालं. दोघेही आपापले Current कसे चांगले आणि दुसऱ्याचे कसे खराब आहे हे सिद्ध करून दाखवू लागले, एडिसन ने AC Current चे भय उत्पन्न करण्यासाठी चक्क एका हत्तीला लोकांच्या समोर विजेच्या शॉक देऊन मारला आणि AC ची शक्ती किती विनाशकारी याचं प्रात्यक्षिक लोकांना दाखवल. परंतु AC Current चे वैशिष्ट्य असे की याचे वोल्टेज ट्रांसफोर्मर द्वारा वाढवून खुप दूर पर्यंत पाठवता येऊ शकत होते. DC मध्ये असे करता येत नाही. त्याच बरोबर AC प्रणालीवर चालणारी उपकरणे DC उपकरणांच्या तुलनेत कमी वीज वापरतात. प्रत्येक घरात वीज ही केवळ AC प्रवाहानेच पोहोचू शकत होती. त्यामुळे शेवटी टेस्ला यांचाच विजय झाला. त्या वेळी DC system प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागू होती आणि एडिसन कंपनी DC उपकरणेच बनवत होती, त्यामुळे एडिसनने या नवीन पद्धतीला विरोध केला. टेस्लाने उद्योगपती जॉर्ज वेस्टिंग हाउस याच्या सोबत नवीन कंपनी चालू केली. या कंपनीने AC प्रणालीचे महत्त्व जगाच्या समोर ठेवले. आज आपल्या घरी खांबावरून जी वीज येते ती टेस्ला यांची AC प्रणाली आहे. टेस्ला यांनी चक्रीय चुंबकीय क्षेत्राच्या सिद्धांताचा शोध लावला. त्यांचा एक आणखी महत्वपूर्ण अविष्कार म्हणजे AC Electric Motor होय. त्यांनी ह्या मोटारच्या साह्याने नायगरा धबधब्यावर पहिले जल विद्युत पावर स्टेशन (Water electric power station) तयार केले, त्या नंतर केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगानेच AC विद्युत वितरण प्रणालीचा स्वीकार केला. १८९१ मध्ये टेस्ला यांना अमेरिकेची न्यूट्रलाइज नागरिकत्व मिळाले . त्याच काळात टेस्ला यांनी wireless power transmission ने वायर विरहित अंतरावर ठेवलेले ब्लब पेटवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. Hollywood मधील The Prestige ह्या चित्रपटात टेस्ला ह्यांची wireless power transmission सोबत अनेक शोध दाखवले आहेत. ह्याच काळात टेस्ला कॉईल चा शोध लागला. असे मानले जाते की टेस्ला यांनी १८९४ मध्ये Invisible Energy (आताचे क्ष-किरण ) किरणांचा शोध लावला होता . परंतु १८९५ साली त्यांच्या प्रयोगशाळेत लागलेल्या आगीत शेकडो संशोधन मॉडेल , डिजाईन, नोट्स , फोटोस सर्व कागदपत्र आणि उपकरणे जाळून खाक झाले. ह्यामागे एडिसनचा हात होता असे देखील काहींचे म्हणणे आहे. Radio Wave शोध: टेस्ला ने रेडियो तरंगाचे (Radio Wave) ट्रान्समिशन करता येते, ह्या थेअरीज १८९३ मध्येच मांडल्या होत्या. वातावरणाच्या बाहेर रेडियो लहरी संपूर्ण जगात कोठेही पाठवता येऊ शकतात असा सिद्धांत मांडला. रेडियोत वापरत असलेला टेस्ला रॉडचा शोध त्यांनीच लावलेला आहे. ह्याचे सादरीकरण करताना त्यांनी Radio Wave Controller वापरून एका बोटीला चालवून दाखवले. हा विषय लोकांमध्ये खूप कुतुहूल करणारा ठरला होता. लोकांना वाटायचे ही जादू आहे, टेलिपॅथी आहे किंवा ह्या बोटी मध्ये प्रशिक्षित माकड लपवले आहे. पण पुढे मार्कोनी नावाच्या संशोधकाला अश्याच Radio Wave Transmission बद्दल पेटंट मिळाले, ह्यावर टेस्ला आणि मार्कोनी ह्यांच्यात पेटंट युद्ध सुरु झालं. कोर्टात खुप काळ खटला चालला, पण पेटंट अखेर मार्कोनी यांना मिळाले. सध्या मार्कोनी याला रेडियोचा जनक मानले जात असले तरी सत्य असे आहे की या शोधात टेस्ला यांचेही तितकेच योगदान लाभले आहे. १८९९ ला त्यांनी Wireless Telegraphy चा शोध लावला त्याच सोबत कृत्रिम वीज निर्मिती सुद्धा केली. एका प्रयोगामध्ये त्यानी लाखो वोल्ट ताकदीची आकाशातील वीज निर्माण केली. त्या विजेची गडगडाट एवढा मोठा होता की २५ किलोमीटर पर्यंत लोकांना ऐकू येत होता. ह्या प्रयोगा दरम्यान लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यांनी पुढे हा पण दावा केला की Wireless Telegraphy प्रयोगा दरम्यान उभ्या केलेल्या रिसीव्हर टॉवर मधून काही अज्ञात सिग्नल मिळाले होते जे की त्यांच्या मते एखाद्या परग्रहावरून एलियन्सनी धाडले होते. ज्या कामासाठी इन्वेस्टर्सनी पैसा लावला होता ते काम न करता टेस्ला यांनी दुसरेच शोध लावले होते त्यामुळे सर्व इन्वेस्टर्सनी त्यांची लॅब बंद पाडली. १९०६ ला ५०व्या वाढदिवसाला त्याने ब्लेड नसलेल टर्बाईन बनवले त्याचा वापर करून त्यानी कोलोराडो धबधब्यात पॉवर स्टेशन बसवले. १९१२ मध्ये ब्रेनला इलेकट्रीक शॉक देऊन ब्रेन अधिक क्रियाशील करण्याच्या थेअरी त्यानी मांडल्या, त्यावर काही प्रयोग देखील केले.१९१७ मध्ये त्यानी आताच्या रडार प्रणाली सारखी ‘इलेक्ट्रिक रे’ ही प्रणाली पाणबुडी शोध घेण्यासाठी मांडली होती पण याबाबतीत त्यांचे बहुतांश अंदाज चुकीचे ठरले. टेस्लाने Death Ray ह्या मशीनचा शोध लावल्याचा दावा केला होत. त्याच्या दाव्यानुसार जवळपास ३०० किलोमीटर दूर बॉर्डरवरून हवेमध्ये असे काही किरणे सोडायचे की त्यामुळे शत्रूची १० हजार फूट उंचीवरील विमाने खाली पाडणे शक्य होईल. संपूर्ण आयुष्य अविवाहित राहणाऱ्या आणि अर्ध्याहून अधिक काळ हॉटेलमध्ये जीवन जगणाऱ्या ह्या अवलियाचा जानेवारी १९४३ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मृत्यू विषयी अनेक चर्चा, मतभेद, तर्क सुरु राहिले. काहींच्या मतानुसार त्यांचा मृत्यू हा संशयास्पद होता. त्यांच्या मृत्यू नंतर अमेरिका सरकारने त्यांचे संशोधन आणि उपकरणे स्वतःच्या ताब्यात घेऊन सर्वसामान्य जनतेपासून लपवून ठेवली आहेत. काही म्हणतात की त्यांचा मृत्यू हा केवळ अमेरिकन सरकारचा एक बनाव होता आणि त्यानंतर ते अनेक वर्ष गुप्तपणे अमेरिकन सरकार साठी काम करत राहिले. आज ही काही जण असे देखील मानतात की टेस्ला यांचे अनेक प्रयोग अमेरिका सरकारनने लुप्त केले आहेत. निकोला टेस्ला यांच्या स्मरणार्थ अमेरिका १० जुलै हा दिवस टेस्ला दिवस म्हणून साजरा करते. टाईम मासिकाने त्यांच्या ७५ व्या Birthday निमित्त आपल्या Cover Page वर त्यांना स्थान दिले होते. या मुहूर्तावर ७० महान वैज्ञानिकांनी त्यांची प्रशंसा केली होती. ह्या कार्यक्रमाला आईनस्टाईन देखील होते. भौतिक चुंबकीय क्षेत्राला त्यांच्या नावावरून टेस्ला हे युनिट देण्यात आल. त्यांच्या नावाने काही अवॉर्ड्स सुद्धा मिळतात. १९५६ मध्ये टेस्ला सोसायटीची स्थापना झाली.
चंद्रावर पृथ्वी पासून दूर असलेल्या एका २६ किलोमीटर व्यासाच्या क्रेटर ला टेस्ला नाव देण्यात आले आहे. एका सूक्ष्म ग्रहाचे नाव २२४४ टेस्ला ठेवण्यात आले आहे. सर्बियाच्या बेलग्रेड विमान तळाचे नाव टेस्ला आहे. सर्बियाच्या विद्युतगृहाचे नाव टेस्लाच्या नावावरून देण्यात आले आहे. अमेरिकेत विद्युत कार निर्माण करणाऱ्या कंपनीचे नाव टेस्ला मोटर्स आहे. त्यांच्या नावे टेस्ला पुरस्कार दिला जातो. बेलग्रेड इथे निकोला टेस्ला संग्रहालय देखील आहे. वॉशिंग्टन मध्ये त्यांच्या नावे काही शाळा, महाविद्यालये आहेत सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे. नायगरा फॉल वरती टेस्ला यांचा मोठा पुतळा आहे. पाश्चिमात्य लोकांना “भारत सापडणं” ही त्यांच्यासाठी अपूर्व घटना होती. त्यांच्यासाठी हा सोन्याचा धूर निघणारा देश म्हणजे मोठाच शोध होता. अर्थात, त्यांच्यासाठी जरी तो “शोध” असेल तर आपल्यासाठी हे कित्येक हजार वर्षांपासून आपलं घरच होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा ‘शोध’ असला तरी आपल्यासाठी फक्त ‘आणखी एक पाहुणा’ एवढंच ह्याचं महत्व. असो, मुद्दा हा की आपण सर्वांनीच शाळेत “भारताला कुणी शोधलं?” ह्या प्रश्नाचं उत्तर एका क्षणात “वास्को दा गामा” असं दिलंय. आपण इतिहासात तेच शिकलोय. सन १४९७ मध्ये जेव्हा वास्को दा गामा भारतात आला तेव्हा “भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन” म्हणून इतिहासाने त्याची नोंद घेतली. पण त्याला भारताचा सागरी मार्ग दाखवणारा एक भारतीय व्यापारीच होता – ही नोंद इतिहासाने फारशी ठळकपणे घेतली नाहीये. हे आश्चर्यकारक आहे कारण – स्वतः वास्कोच्या रोजनिशीमधेच ही नोंद आहे…! प्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ डॉ. हरिभाऊ वाकणकर ह्यांनी लंडनच्या म्युझियममध्ये असलेली वास्को दा गामाची रोजीनिशी वाचली तेव्हा त्यांना ही नोंद वाचून सुखद धक्काच बसला. आपल्या रोजनिशीमध्ये सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताचा शोध का घ्यावासा वाटला, त्याची तयारी कशी केली आणि प्रवास प्रयाण कसं झालं…ह्या सगळ्या नोंदी वास्कोने करून ठेवल्या आहेत. आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ एक प्रचंड जहाज बघून वास्को आश्चर्यचकित झाला. चौकशी करण्यासाठी आपल्या नोकराला त्याने ह्या भल्या मोठ्या जहाजावर पाठवलं. परतल्यावर नोकराने ‘हे भारतीय व्यापाऱ्याचं जहाज आहे’ हे सांगितलं आणि हरखून जाऊन वास्को स्वतः त्या जहाजावर गेल्या. “मला भारत शोधायचा आहे” असं म्हटल्यावर गडगडाटी हास्य करत तो ढेरपोट्या व्यापारी म्हणाला : अरे, तू काय भारत शोधणार? आमच्या अनेक पिढ्या मसाल्याच्या पदार्थाच्या विक्रीसाठी भारतातून इथे येतात. दोन दिवसांत माल संपतो व आम्ही परत जातो. दोन दिवस थांब, आमच्या मागोमाग ये. वास्कोने तेच केलं. व्यापाऱ्यासोबतच राहून त्याचा आफ्रिकेतला व्यापार बघितला आणि दोन दिवसांनी व्यापाऱ्याच्या जहाजामागे आपलं जहाज लावलं ! अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रसिद्ध गुजराती व्यापारी कांजी मलम हाच वास्को दा गामाचा सागरी वाटाड्या होता. वास्कोला आफ्रिकेच्या मालंदी बंदरापासून कालिकत (कोझिकोडे, केरळ) बंदरावर कांजी मलमनेचं आणलं असं म्हटलं जातं. असो – कांजी मलम की आणखी कुणी – डॉ. हरिभाऊ वाकणकर ह्यांच्यानुसार वास्कोला भारतात आणणारा भारतीय व्यापारीच होता, हे मात्र नक्की ! १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर लष्कर-ए-तयब्बा आणि जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढविला. हा हल्ला म्हणजे सरळ सरळ भारतीय लोकशाहीचा हत्या करण्याचा प्रयत्न होता. परंतु अतिरेक्यांचे फुसके मनसुबे आपल्या वीर जवानांनी पार धुळीस मिळवून टाकले आणि भारताची शान असणाऱ्या संसदेची लाज राखली. परंतु जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर दहशतवाद्यांनी केलेल्या या आघाताची सल अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनाला टोचत आहे. विसरायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या आठवणी संसदेला पाहिल्यास आजही डोळ्यासमोर उभ्या राहतात…. १३ डिसेंबर २००१ चा तो दिवस नेहमी सारखाच सुरु झाला. भारतीय संसदेच्या भोवताली रोज असायची तशीच परिस्थिती होती. संसदेचं कामकाजही एव्हाना सुरु झालं होतं. प्रत्येक चेहरा आपापल्या कामात व्यस्त झाला. अधिवेशन सुरु असल्याकारणाने मंत्री, खासदार आणि इतर अतिशय महत्त्वाच्या व्यक्ति संसदेमध्ये उपस्थित होत्या. घड्याळ ११ वाजून ४० मिनिटांची वेळ दाखवत होते. तेवढ्यात लाल दिव्याच्या एका ऍम्बेसेडर कारने संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. गाडीवर गृहमंत्रालय आणि संसदेच स्टीकर लावलेलं असल्याने कोणत्याही अडथळ्याला तोंड न देता कार वेगाने आत शिरली. जेव्हा कार आता आली आणि थांबली तेव्हा कारमध्ये बसलेल्या एका दहशतवाद्याने बाहेर येत स्वत:ला हॅण्ड ग्रेनेडसह उडवून दिले. अचानक झालेल्या त्याच्या जबरदस्त स्फोटामुळे क्षणभर संपूर्ण वातवरण भांबावले. नक्की काय झालंय याची कुणालाही कल्पना येत नव्हती. जो तो स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात होता. दुसऱ्याच क्षणाला कारमध्ये बसलेल्या इतर दहशतवाद्यांनी एके 47 रायफलमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि प्रत्येकाची पळापळ सुरु झाली. हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. हल्ला होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेबाहेर पडले होते, परंतु उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजनांसमवेत १०० पेक्षा जास्त खासदार सेंट्रल हॉल आणि इतर भागात उपस्थित होते. या गोष्टीची जाणीव होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित सेंट्रल हॉलचे दरवाजे बंद केले आणि खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याच्या दहशतवाद्यांच्या योजनेला सुरुंग लावला. कारमध्ये एकूण ६ दहशतवादी होते. त्यापैकी एकाने आत्मघातकी स्फोट घडवत स्वत:चा जीव दिला, तर इतर ५ जणांसोबत कडवी झुंज देत सुरक्षा जवानांनी अवघ्या अर्ध्या तासात त्यांना कंठस्नान घातले. अर्ध्या तास चालेल्या या थरारनाट्यात ५ जवानांनी प्राणांचे बलिदान दिले, तर ९ जणांना दहशतवाद्यांनी अंधाधुंद केलेल्या गोळीबारात स्वत:चा प्राण गमवावा लागला. |
Author
|